नागपूर ब्युरो : महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा राज्यातल्या वीज ग्राहकांना, कृषी पंप धारकांना, शेतकऱ्यांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांना फसवले आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासूनच सतत वीज बिलाच्या संबंधाने राजकारण सुरू आहे. असा आरोप भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
बावनकुळे म्हणाले, कधी सांगतात की 100 युनिट बिल माफ करू, कधी सांगतात कोरोना च्या काळातील चार महिन्याचं बिल माफ करू, कधी सांगतात शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणार नाही, मध्यमवर्गीयांचे कनेक्शन कापणार नाही. त्यानंतरही कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात याविरोधात प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आम्ही ही मोहीम थांबविलेली आहे. दोन मार्चला राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात अशी घोषणा करतात आणि आठ तारखेला राज्याचे ऊर्जामंत्री विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहात जाऊन यावरील बंदीला उठवतात.
ज्या मोहिमेला खालच्या सभागृहात स्थगिती मिळाली, ती स्थगिती वरिष्ठ सभागृहाततुन हटविण्यात येते. ही सर्व नौटंकी आहे. या सरकारच्या मनगटात ताकत नाही, धमक नाही. जेव्हा आमचं सरकार होतं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापू नका. पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांना अविरत वीज कनेक्शन देण्यात आले. ोणत्याही शेतकर्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आलं नाही.
विरोधी पक्ष म्हणून बदला घेतल्या शिवाय राहणार नाही
ते म्हणाले आता आम्ही ठरवलय या सरकारच्या अशा धोरणांच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून आम्ही जेलभरो आंदोलन करणार. 50 हजार लोक शासनाच्या या धोरणाच्या विरोधात जेलमध्ये जाणार. सरकारने सामान्य लोकांशी बेइमानी केली आहे. याचा बदला विरोधी पक्ष म्हणून आम्ही घेतल्या शिवाय राहणार नाही. आम्ही पुन्हा आंदोलन करू. आता जर सामान्य नागरिक किंवा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी कोणी विद्युत कर्मचारी आला तर त्याच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेतली जाईल. प्रसंगी आंदोलन करून वीज कापू देणार नाही.