औरंगाबाद ब्युरो : औरंगाबाद शहरामध्ये गुरुवार पासून अशंतः लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे 4 एप्रिलपर्यंत या अशंतः लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पूर्णतः तयारी केली आहे.
मास्क न वापरणे आणि लॉकडाऊनच्या काळातील नियम पाळले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसाला 550 पर्यंत पोहचली आहे. त्यात ट्रेसिंग आणि टेस्टींग वेळेत होत नसल्यानं कोरोना रुग्णांचे निदान लवकर होत नाही, त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळेच गुरुवार पासून (11 मार्च) औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
11 मार्चपासून 4 एप्रिल पर्यंत खालील बाबी बंद
- औरंगाबाद शहरात या लॉकडाऊनच्या काळात मंगल कार्यालय, लॉनमधील लग्न सोहळ्यावर बंदी आहे.
- त्यासोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी असणार आहे.
- जाधववाडी भाजीबाजार बंद राहणार आहे.
- आठवडी बाजारही भरणार नाहीत.
- येत्या शनिवार-रविवारी मात्र शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे.
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने रात्री नऊपर्यंत खुली ठेवता येतील.
- एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्के ग्राहकांना बसण्याची मुभा.
- रात्री 11 वाजेपर्यंत पार्सल सुविधा मात्र देता येईल.
- या काळात खासगी कार्यालये बंद असतील तर सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.
- शनिवार-रविवारी सर्व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद. होम डिलिव्हरी सुरू राहील.
- सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम, मोर्चे-आंदोलने, आठवडे बाजार, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद.
- खेळाडूंनी नियमांचे पालन करून सराव करावा.
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील.
काय सुरू राहणार आहे?
- या काळात फक्त वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र वितरण, दूध विक्री, भाजीपाला-फळे विक्री, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रॉल पंप, गॅस, बांधकामे, उद्योग कारखाने सुरू राहतील.
- किराणा दुकाने सुरू राहतील, मात्र मॉल बंद.
- चिकन, मटण, अंडी-मांस विक्रीची दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य सेवा, बँक सेवा सुरू राहतील.