मुंबई ब्युरो : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला. कारण या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाशक्ती या सरकारकडे नाही, असा आरोप भाजपकडून केला जात होता. त्यातच काही दिवसांतच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी एक मोठी बैठक आयोजित करण्यता आली आहे.
मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसेच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ यांच्यासोबत ही बैठक होत आहे.
ही बैठक रविवारी दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर होत आहे. बैठकीत आरक्षणाबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी नेमक्या काय हालचाली होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या बैठकीतील चर्चेच्या आधारेच सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने काही दिवसांपूर्वी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसंच सरकारी भरतीच्या बाबतही वादंग निर्माण होत आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.