राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई हा चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझेकडून १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर ईडीने ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांकडे सोपवली. परंतु अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले.
“अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाला असे मला वाटते. त्यांच्याबाबतीत आम्ही थोडे संयमाने घ्यायला पाहिजे होते. कारण अनिल देशमुखांच्या संदर्भात काय पुरावे होते हे आम्ही पाहिले आहेत. अनिल देशमुखांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर शेकडो धाडी घातल्या. सीबीआयने २२ धाडी घातल्या, ईडीने ५० च्या वर धाडी घातल्या, आयकर विभागाने ४० धाडी घातल्या. इतक्या धाडी घालून तुम्हाला कोणता विक्रम प्रस्थापित करायचा होता?’, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.
अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवारांवर दबाव होता का, असा प्रश्न विचारला असता मला असे वाटत नाही असे ते म्हणाले. नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकार घेत का नाही, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, आम्ही मलिकांचा राजीनामा का घ्यायचा? अनिल देशमुखांचाच राजीनामा घेणे ही आमची चूक होती, त्यांचा राजीनामा घ्यायला नको होता हे मी आजही म्हणतो आहे.