सेंटर फॉर सायन्स, टेक्नाॅलॉजी अँड पाॅलिसी या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या हवामानाचा अभ्यास करून धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार उन्हाळा व हिवाळ्यातील तापमान गेल्या ३० वर्षांच्या तुलनेत २०२१-२०५० या काळात १ ते २ अंश सेल्सियसने वाढणार आहे. शिवाय पाऊसही वाढेल. बदलत्या हवामानाचा गंभीर परिणाम महापूर, शेती वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामांवर होणार आहे. जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांकात भारत आधीच जगात सातव्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
प्रा. चोपणे म्हणाले, महाराष्ट्रात २०३० पर्यंत १ अंश तर असेच प्रदूषण राहिले तर २०३०-२०५० पर्यंत २ अंश तापमान वाढेल. उन्हाळ्यात ०.२५ ते ०.४२ अंशाने, तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान पुढील १० वर्षे कमी होणार नसले तरी उद्योग तसेच औष्णिक वीज केंद्रातून उत्सर्जित होणारे वायू, जल प्रदूषण कमी करणे, शहरात व औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण, ग्रामीण भागात रस्ते, रेल्वे, शेती परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढवणे, लहान बंधारे, जलसाठे वाढवणे, निसर्गपूरक जीवनशैली अशा अनेक प्रयत्नांनंतरच स्थानिक हवामानातील बदल रोखला जोऊ शकतो.
सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्हे
गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे. सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपुरात मात्र (०.८) तापमान कमी होणार आहे.
राज्यातील १ पेक्षा अधिक अंश तापमान वाढीचे जिल्हे
भंडारा : २.०, अकोला :१.३, अमरावती : १.६, औरंगाबाद : १.१, बीड : १.२, बुलडाणा : १.४, धुळे : १.१, गोंदिया : १.१, हिंगोली : १.२, जळगाव : १.३, लातूर : १.४, नागपूर : १.१, नंदुरबार : १.६, उस्मानाबाद : १.४, वर्धा : १.१, वाशिम : १.२, यवतमाळ : १.१.