Home कोरोना #Covid_19 | ज्या वेगाने रुग्ण वाढताहेत, त्याच वेगाने ते घटतीलही : तज्ज्ञांचे...

#Covid_19 | ज्या वेगाने रुग्ण वाढताहेत, त्याच वेगाने ते घटतीलही : तज्ज्ञांचे मत

575

देशात शुक्रवारी १.३७ लाख नवे रुग्ण आढळले. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणेच शहरांतून सुरू झाली आहे. मात्र यंदा संसर्गाचा वेग ५ पट जास्त आहे. तिसरी लाट पुढील आठवडाभरात इतर शहरांतही विक्राळ रूप घेऊ शकते, अशी शंका तज्ज्ञांना आहे. मुंबई व कोलकात्यात तसे दिसून येत आहे. या शहरांत दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या दुप्पट नवे रुग्ण वाढत आहेत. दर दीड दिवसात नवे रुग्ण दुप्पट हाेत आहेत. आठवडाभर हा वेग कायम राहिला तर मुंबईत रोज ५० हजारांवर रुग्ण आढळू शकतात. मुंबईत २४ तासांत २० हजारांवर रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेत रोजच्या रुग्णांची सरासरी कधीच ९,७५३ पेक्षा जास्त नव्हती. कोलकात्यात एका दिवसात ६,५६९ रुग्ण सापडले. दुसऱ्या लाटेत उच्चांकी सरासरी ३,८८७ होती.



सर्वसामान्यांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, मुंबई आणि कोलकात्यात दर तिसऱ्या चाचणीत एक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. म्हणजे, १०० चाचण्यांमागे ३३ ते ३५ नवे रुग्ण. मात्र, वैज्ञानिकांत याबाबत मतांतरे आहेत. सफदरजंग रुग्णलयात (दिल्ली) मेडिसिन विभागाचे प्रोफेसर जुगलकिशोर म्हणाले, ‘जेवढ्या वेगाने रुग्ण वाढतील, तेवढ्याच वेगाने ते घटतील. कारण, एखादे शहर व भागात प्रत्येक तिसरी व्यक्ती बाधित आढळू लागली आहे. यामुळे काही दिवसांत बाधित न झालेले कुणीच उरणार नाही.

हेच आपण दुसऱ्या लाटेत अनुभवले आहे. या हिशेबाने पाहिले तर मंुबई-कोलकात्यात ८ ते १० दिवसांनी नवे रुग्ण घटण्यास सुरुवात होऊ शकते. दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या सिरो सर्व्हेत देशाच्या ८०% लोकसंख्येत अँटिबॉडी आढळली होती. म्हणजेच, ते बाधित होते. एवढी प्रचंड लोकसंख्या बाधित झाल्यानंतर तिसऱ्या लाटेचा पीक २०-२२ दिवसांत येऊ शकतो. यापैकी ११ दिवस उलटले आहेत. म्हणजे १७ जानेवारीनंतर देशात नवे रुग्ण कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.’