राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर राज्य सरकार अलर्ट झाले आहे. मात्र राज्यात पुन्हा निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण ठरू शकते. यासंदर्भात निर्णय पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
शिक्षण विभागाने राज्यातील शाळा 01 डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहे. मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अनेक ठिकाणी शाळा सुरू होऊ शकलेल्या नाही. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या नाहीत त्यांनी शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना टोपे यांनी दिल्या आहेत.
दर सोमवारी होणाऱ्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोससाठी केंद्राकडे आग्रह धरला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याशिवाय राजकीय बैठका, मेळाव्याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार अलर्टवर
राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांनंतर राज्य सरकार अलर्ट झाले आहे. परदेशातून आलेल्या 100 टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
पुन्हा निर्बंध लावणे जाचक
राज्यात लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण होईल, परिस्थिती पाहून व त्यावर लक्ष ठेवून, टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्रसरकारशी चर्चा करूनच पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय होईल. असा इशारा देखील टोपे यांनी दिला आहे.