राज्यात सध्या उष्णतेची लाट आली असून त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच हवामान खात्याने मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, मान्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सून कर्नाटकमधील कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत राज्यातील अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे.
केरळमध्ये मान्सूनने 29 मे रोजी प्रवेश केला आहे. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत येऊन ठेवला आहे. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये पोहोचेल, असे भाकीत हवामान विभागाने केले होते. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच थांबला आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सून दाखल झाला आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.