कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत आज घेण्यात आला. अशी ट्विट द्वारे माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
यानंतर यासंदर्भात युवासेनेकडून राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती, असेही एक पत्र उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. यावर युवासेनेच्या वरूण सरदेसाईंसह अजून एका पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.
उदय सामंत यांना या संदर्भात युवा सेनेने पाठवलेल्या मागणी पत्रात म्हटले होते की, मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व विद्यापीठांनी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाई पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे.
गेली दोन वर्षे विद्यार्थांनी एमसीक्यु बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने परीक्षा दिल्या. असे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे पेपर लिहण्याचा मुलांना सराव राहिलेला नाही. व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे. त्यापेक्षा अर्धा, एक तास वेळ वाढवून देण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत पूर्ण पेपर लिहिता येईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या पत्रावर युवासेना सचिव वरूण सरदेसाई आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांची स्वाक्षरी होती. या मागणीचा विचार करत राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.