देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एमबीए आणि पीजीडीएम महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) संस्थेच्या अकराव्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून टोपे बोलत होते. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या २०१८-२०२० या तुकडीच्या ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना टोपे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली.
टोपे म्हणाले, “आपण काळाच्या मागे असलेला अभ्यासक्रम शिकवत असू, तर त्याला काही अर्थ नाही. विद्यार्थी पदवी घेऊन उत्तीर्ण होतील, परंतु ते बेरोजगार राहतील. शिक्षणासोबत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. अनुभव आणि शिक्षण हे कळीचे मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांनी नैतिकता, नीतिमत्ता, नम्रता आणि तत्त्वे ही जीवनमूल्ये अंगीकारावी, असेही ते म्हणाले.