पंजाबमधील फिरोजपूर येथील होणारी भाजपची रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे अचानक रद्द करण्यात आली. यामुळे भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचे कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना? हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिले पाहिजे. असे करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितले पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोलेंना कधी कोणी सीरिअसली घेत नाही. ते राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचे ऐकतो. पण एरव्ही ते कधीच सीरिअस नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी सीरिअसली बघत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.