Home मराठी लॉकडाऊन केले तर औरंगाबाद शहराचे दररोज किमान 125 कोटींचे नुकसान होणार

लॉकडाऊन केले तर औरंगाबाद शहराचे दररोज किमान 125 कोटींचे नुकसान होणार

466

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नाही, असा सूर राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री लावत आहेत. त्याची अंमलबजावणी औरंगाबादमध्ये झाल्यास दररोज किमान १२५ कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या दोन लाटांनंतर औरंगाबादची अर्थव्यवस्थाही गेल्या काही महिन्यांत भरून निघत असताना तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसानीचा अंदाज काढण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने काही अर्थतज्ज्ञ, व्यापार क्षेत्राचे अभ्यासक आणि व्यावसायिकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी किमान १२५ कोटींचा रोज फटका बसेल, असे सांगितले.

वाळूजला ३८००, रेल्वे स्टेशन १५०, चिकलठाणा ७००, शेंद्रा ४००, पैठण ५०० तर डीएमआयसीत ७५ उद्योग आहेत. येथे २,२५,००० कामगार काम करतात. महिन्याला २ ते २.५ हजार कोटींची तर दिवसाकाठी ६५ ते ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघात ८५ संघटना समाविष्ट आहेत. त्यांची एकूण दैनंदिन उलाढाल ५० कोटींच्या वर आहे. शहरात २७५ तर जिल्ह्यात १७५ परमिट रूम आहेत. जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या १२०० तर ढाबे ९०० पेक्षा अधिक आहेत. बारची दिवसाची सरासरी २० लाख रुपये उलाढाल होते.

तर हॉटेल, रेस्टॉरंट व लॉजिंगची दिवसाकाठी ७० ते ८० लाखांची उलाढाल आहे. दोन्ही मिळून दिवसाला एक कोटीच्या पुढे उलाढाल होते. औरंगाबाद जिल्हा पेट्रोल असोसिएशनचे २०० हून अधिक पंपचालक सदस्य आहेत. दिवसाला ४ ते ४.५० लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. १११ रुपये लिटर दराप्रमाणे ४ कोटी ९९ लाखांची उलाढाल होते. दिवसाला २ ते २.५० लाख लिटर डिझेलची विक्री होते. ९६ रुपये लिटरप्रमाणे २ कोटी ४० लाखांची म्हणजे दिवसाला ७ ते ७.२५ कोटी रुपयांची उलाढाल होते. या साऱ्यांचे लॉकडाऊनने नुकसान होणार, असा प्राथमिक अंदाज आहे.