मुंबई ब्युरो : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या दिवाळीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे चालू वर्षी फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
दुसरीकडे, लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळी सणासाठी नियमावली जाहीर केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करु नये, उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
काय आहेत नियम?
- मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचे पालन करावे.
- दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा
- नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.
- राज्यातील धार्मिक स्थळे खुली केली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादेत राहील याची दक्षता घ्यावी
- खरेदीसाठी बाजारात गर्दी टाळावी
- ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे
- दिवाळी पहाट कार्यक्रम नियमानुसार होतील
- आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.
#Maha_Metro | सीताबर्डी मेट्रो स्थानकावर पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन