मुंबई ब्युरो : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे, असा अनुभव जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी ट्विटवरून शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयीच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे, असं पाटील म्हणाले.
याच दिवशी स्वराज्याचा अरुणोदय झाला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी 6 जून हा आनंदाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाला. 2019 साली जानेवारी महिन्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली. गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिली असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती, असं ते म्हणाले.
हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण: मुख्यमंत्री
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.