Home Maharashtra Maharashtra | देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra | देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई ब्युरो : मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि परमबीर सिंग लेटर प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शडू ठोकलेल्या भाजप नेत्यांनी आज राजभवन गाठले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदारांच्या शिष्टमंडळांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते.

भाजप नेत्यांकडून ही सदिच्छा आणि पूर्वनियोजित भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. पण राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

विशेष म्हणजे, याच महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या तडाख्यामुळे महाविकास सरकार पार गळून गेल्यासारखं दिसायला लागलंय. दर काही दिवसांनी फडणवीसांचे येणारे नवे गौप्यस्फोट, एनआयए आणि एटीएसच्या चौकशीतून येणारी नवनवीन माहिती आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक प्रकारे केलेलं बंड यातून सरकारला सुधारत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर या सगळ्या प्रकरणात सत्ताधारी शिवसेना पक्ष एकटा पडल्यासारखा दिसत होता. पण 20 मार्चला परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आले आहेत. पक्ष आणि सरकार बॅकफूटवर जात आहे हे पाहताच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून खिंड लढवली खरी पण अजूनही फडणवीसांच्या तडाख्याला सत्ताधारी पक्षांना हवं तसं उत्तर देता आलं नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर कोणतंही मत जाहीरपणे व्यक्त केलं नाही. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही सध्यातरी मौन बाळगण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय. नाही म्हणायला लोकसभेत भाजप खासदारांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्रमकपणे उत्तर दिलं खरं. पण तितकंच. महाविकास आघाडीवर होणाऱ्या हल्ल्याला पॉईंट बाय पॉईंट उत्तर अजून तरी शिवसेनेला देता आलेलं नाही.

एकीकडे गृहमंत्र्यांवर भाजपचे प्रहार होत असताना काही अपवाद वगळता बाकीचे राष्ट्रवादीचे नेते या गदारोळात आपला नंबर लागू याचीच काळजी घेताना दिसत आहे. फक्त राजकीय आरोप असते तर गोष्ट वेगळी होती पण पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यानेच गृहमंत्री देशमुख यांच्यावर खंडणी गोळा करण्याचा आरोप केल्याने पक्षाची चांगलीच गोची झालेली दिसत आहे. एकंदरीतच काय तर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना येत्या काही दिवस रंगलेला पाहायला मिळणार आहे.