राज्य सरकार विदर्भासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण आणण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नागपूर येथे ही माहिती दिली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण आणले जात असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.
या संदर्भात शुक्रवारी नागपूरात झालेल्या बैठकीत विदर्भातील ज्या सहकारी सूतगिरण्यांमध्ये राज्य सरकारचे भाग भांडवल अडकले आहे त्या सर्व सूतगिरण्यांची माहिती घेऊन बंद पडलेल्या सूतगिरण्या परत कशा पद्धतीने सुरु करता येईल याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आल्या आहे. सोबत कापसाचे प्रक्रिया उद्योग विदर्भातच उभे करण्यावर सरकारचा भर असल्याचे वस्त्रोद्योग राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.