मुंबई ब्यूरो : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अजूनही बंद आहेत. तरीसुद्धा, शाळा बंद शिक्षण सुरू, अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे शाळांकडून दिले जात असताना या ऑनलाइन शिक्षणात दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती खुद्द राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. 15 जूनपासून राज्यातील शिक्षण विभागाने शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करून शिक्षण चालू ठेवले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे. त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
अकरावी कॉलेज प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच लवकरात लवकर अकरावीच्या कॉलेज प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).