इंडोनेशिया सोमवार, 23 मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवणार आहे. देशाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी गुरुवारी याची घोषणा केली. पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाने 28 एप्रिल रोजी स्वतःच्या देशात तेलाचा तुटवडा असल्याने निर्यातीवर बंदी घातली होती. देशात खाद्यतेलाचा पुरवठा पुरेसा व्हावा आणि किमतीही कमी व्हाव्यात, यासाठी मी स्वतः त्यावर लक्ष ठेवेन, असे राष्ट्राध्यक्ष विडोडो म्हणाले होते.
इंडोनेशिया सरकारच्या या निर्णयानंतर आता भारतात खाद्यतेलाच्या किमती खाली येऊ शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की बंदी उठल्यानंतर 2-2.5 लाख टन पाम तेल लवकरच भारतात येईल आणि पुरवठा सुधारल्यामुहे दरावर परिणाम होईल. वास्तविक, भारत 60-70% तेल आयात करतो. यापैकी 50-60% पाम तेल आहे. या निर्णयामुळे केवळ पामतेलाच्या किमती कमी होणार नाहीत, तर इतर तेलांवरही त्याचा परिणाम होईल.
खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, इंडोनेशियातील बहुतेक पाम तेल उत्पादकांनी त्याची निर्यात करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे ही बंदी घालण्यात आली. बंदीनंतर, शेकडो इंडोनेशियन लहान शेतकऱ्यांनी राजधानी जकार्ता आणि देशाच्या इतर भागांमध्ये निदर्शने केली आणि सरकारकडे पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.