मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या सरकारने सोमवारी एकाचवेळी राज्यात 13 नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी सरकारने राज्यातील सर्वच 13 जिल्ह्यांची फोड केली आहे.
मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे राज्यातील 13 नव्या जिल्ह्यांचा शुभारंभ केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रेड्डींनी सत्ता मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक नवा जिल्हा स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. त्यानुसार आता राज्यातील जिल्ह्यांचा आकडा 26 वर पोहोचला आहे.
13 जिल्हे राहिले होते
2013 मध्ये तेलंगणाची स्थापना झाल्यानंतर आंध्र प्रदेशात अवघे 13 जिल्हे शिल्लक राहिले होते. त्यामुळे आंध्र सरकारने गत जानेवारी महिन्यात विद्यमान 13 जिल्ह्यांतून नवे 13 जिल्हे तयार करण्याची एक मसूदा अधिसूचना जारी केली होती.
मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना नव्या जिल्ह्यांतील पदभार वाटप प्रक्रिया सुरुळीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांना 4 एप्रिल रोजी सर्वच नव्या 13 जिल्ह्यांत हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
नव्या जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती
मुख्यमंत्री बुधवारी 13 नव्या जिल्ह्यांची स्थापना करण्यासाठी अथक कष्ट करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करणार आहेत. शनिवारच्या अधिसूचनेनंतर जगन सरकारने आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांत मोठे फेरबदल करत नव्या जिल्ह्यांत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची नियुक्ती केली आहे.
कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती
- विजयनगरम जिल्ह्यातून मान्यम जिल्हा
- विशाखापट्टनम जिल्ह्यातून अनकापल्ली जिल्हा
- विशाखापट्टनम जिल्ह्यातूनच अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याची निर्मिती
- गुंटूर जिल्ह्यातून पलनाडू जिल्हा
- बापटलाचीही गुंटूर जिल्ह्यातून निर्मिती
- कर्नूल जिल्ह्यातून नंदयाल जिल्हा अस्तित्वात
- पूर्व गोदावरी जिल्ह्यातून काटकर काकीनाडा जिल्ह्याची निर्मिती
- कोनसीमाचीही पूर्व गोदावरी जिल्ह्यातून निर्मिती
- एलुरु जिल्हा पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून अस्तित्वात
- श्री सत्य साई जिल्हा अनंतपूरमधून अस्तित्वात
- एनटी रामाराव जिल्हा विद्यमान कृष्णा जिल्ह्यातून तयार
- चित्तूर जिल्ह्यातून श्री बालाजी जिल्ह्याची निर्मिती
- कडप्पा जिल्ह्यातून अन्नामाया जिल्हा तयार