शिवसेनेने आपल्या मुखपत्रात भाजपविरुद्धच्या आघाडीत काँग्रेसला वगळता येणार नाही असे म्हटले आहे. त्यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फणडवीस यांनी शिवसेना खासदार संजय राउत यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. सामनाच्या संपादकांचे केंद्रबिंदूच बदलले आहे. त्यांचे नेते सुद्धा बदलले आहेत असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.
शिवसेनेच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, सामना आणि सामनाच्या संपादकाचे केंद्र बिंदूच बदलले आहे. अलिकडच्या काळात त्यांचे तीन नवीन नेते झाले आहेत. ते म्हणजे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत. त्याचीच प्रचिती आता शिवसेनेच्या मुखपत्रातून दिसून येत आहे असा चिमटा माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांचे संप मिटवण्यासाठी आम्ही सरकारला विरोधीपक्ष म्हणून सहकार्य केले. आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा काही पावले पुढे यायला हवे. पण, ते यासाठी तयार दिसत नाहीत. राज्य सरकारमध्ये संवेदना राहिलेल्या नाहीत. त्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यापूर्वी एकदा विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमके काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु, काँग्रेसला वेगळे पाडले. देशात यूपीए आघाडी अस्तित्वात राहिलेली नाही असे त्यांनी म्हटले होते. या विधानाची देशभर चर्चा झाली.
आता भाजपविरोधात नवीन आघाडीमध्ये काँग्रेसला समाविष्ट केले जाणार नाही का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. परंतु, शिवसेनेने आपल्या मुखपत्रात काँग्रेसला महत्व दिले. काँग्रेसला वेगळे करून नरेंद्र मोदींचा सामना करता येणार नाही. एवढेच नव्हे, तर काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवल्यास सद्यस्थितीच्या ‘फासिस्ट’ राज प्रवृत्तीला बळ देणे असेच होईल. काँग्रेसचे ज्यांच्यासोबत मतभेद आहेत, ते ठेवून सुद्धा यूपीएची गाडी पुढे नेली जाऊ शकते असे सामनातून सांगण्यात आले आहे.