गडचिरोली ब्युरो : अहेरी इस्टेट बाबत न बोलता आपण गडचिरोली जिल्ह्याचा उल्लेख करूच शकत नाही. अहेरी इस्टेट वर नेहमीच आत्राम घराण्याने राज केले आहे. मात्र याच घराण्यातील धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतःची #जनतेचा_राजा अशी वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळविले आहे, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. धर्मराज बाबांनी आपल्या राज घराण्याचे वैशिष्ट्य असलेला काँग्रेस विरोध बाजूला सारत प्रारंभी काँग्रेस पक्ष व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुका लढवून यश संपादन केले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रच नव्हे तर एकूणच गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे केवळ धर्मराव बाबा आत्राम असे समीकरण आज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी खात्याचे मंत्री पद सुद्धा बाबा आत्राम यांनी भुषविले आहे. बाबा आत्राम यांची एक वेगळी ओळख या क्षेत्रातील जनमाणसात रुजलेली दिसते.
तीन पक्षांच्या आघाडी मुळे मंत्री पद मिळू शकले नाही
सध्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात विकास पोहोचविण्याचे भरपूर प्रयत्न केले. यावेळी जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा अशी शक्यता वर्तविली जात होती की त्यांची पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिपदी वर्णी लागेल. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “महा विकास आघाडी” स्थापन झाल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मंत्री होता आले नाही. तरीदेखील त्यांनी या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू ठेवले.
नेहमीच असतात चर्चेत
गडचिरोली जिल्ह्यात धर्मराव बाबा आत्राम हे राजकारणातील वलयांकित नाव आहे यात काही दुमत नाही. कारण धर्मराव बाबा आत्राम यांना घेऊन राजकीय क्षेत्रात अनेकदा चर्चांना ऊत येत असते. कधी अशी चर्चा सुरू असते की धर्मराव बाबा आत्राम गडचिरोली लोकसभा क्षेत्रासाठी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील. तर कधी त्यांच्या काँग्रेसमध्ये “घर वापसी” बद्दल चर्चेला उत येत असते. मुळात अहेरी राजघराण्याशी संबंधित असून सुद्धा धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतःची ओळख #जनतेचा_राजा अशीच निर्माण केल्याने ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतातच. उलटपक्षी अहेरी इस्टेटच्या मूळ आत्राम राजघराण्याबाबत जनतेला इतकी आत्मीयता आता जाणवत नाही. किंबहुना सत्यवानराव महाराजांसोबतच ती ओसरत गेल्याचे दिसून येते. आता तर येथील राजे म्हणजे धर्मराव आत्राम अशीच भावना जनसामान्यात दिसून येते.
#40KiShakti | सोशल मीडिया पर ट्रेंड हुआ प्रियंका गांधी का नारा #लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ
- भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेचे आम्ही पालन करतो. वाचकांना एखाद्या बातमी विषयी आपली तक्रार करायची असल्यास आमच्या वेब माध्यम तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. प्रकाशक : (ई-मेल)- aatmnirbharkhabar@gmail.com