नागपूर ब्युरो : तलवारीने कोणीही विजय मिळवू शकतो. पण विचाराने विजय मिळवणे हे कठिणच आहे. भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला, असं सांगतानाच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प या ठिकाणी सुद्धा निश्चित होईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे धम्म चक्रपरिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मन:शांती देणारे ठिकाण आहे. ड्रॅगन पॅलेसमध्ये अनेक उपक्रम सुरू आहे. सुलेखा कुंभारे यांनी हे कार्यक्रम घडवून आणले आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत आमचं नावही चालत राहील, असं सांगतानाच बुद्धिष्ट थीम पार्कचा प्रकल्प सुद्धा या ठिकाणी निश्चित होईल याची ग्वाही देतो, असं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
बुद्ध सर्किटचं लवकरच पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. बुद्धांचा संदेश हा जागाच कल्याण करणारा आहे. जगातील जटिल प्रश्न सुद्धा बुद्धाच्या विचाराने सुटू शकतात. बुध्दाशी संबंधित असलेल्या सगळ्या ठिकाणांना जुळणारे रस्ते बांधण्याची संधी मला मिळाली. या बुद्ध सर्किटच लवकरच पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
ड्रॅगन पॅलेसमध्ये एक तास मेडिटेशन करायचंय
भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचं सुद्धा कल्याण करणारा आहे. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसपर्यंत मोठा निधी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पोहोचविला, असं गडकरी म्हणाले. प्रत्येकाच्या पोटाला खायला मिळालं की काम चांगलं होतं. चिंधी वेस्ट मटेरियलपासून कार्पेट बनविण्याच काम नागपुरात सुरू झालं आहे. त्याला मोठी मागणी आहे. रोजगार वाढविण्यासाठी काम केलं जातं आहे . कोणीही माणूस जातीने मोठा नसतो. गुणांनी मोठा असतो. त्यामुळे जातीभेद नको. हे स्थळ जगातील क्षेत्रातील मोठं स्थळ व्हावं यासाठी शुभेच्छा आहेत. आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहू, असं सांगतानाच मला ड्रॅगन पेलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये कोणतीही गर्दी न करता 1 तास बसायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
… तर फडणवीस मुख्यमंत्री होतील
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेने भाषणाची सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हवे होते या विजय दर्डा यांच्या बोलण्यावर आठवले यांनी मिष्किल भाष्य केलं. फडणवीस आताही मुख्यमंत्री होऊ शकतात. तुम्ही या सरकारमधला एक बाहेर काढा. फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं आठवले यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. भाजप सोबत आम्ही आहोत. कारण भाजप जनतेसाठी काम करत आहे. भाजप आरक्षणाच्या विरोधात नाही. ते नेहमी दलित जनतेच्या सोबत आहेत. सुलेखा कुंभारे तुम्ही आणि आम्ही भाजप सोबत आहोत, आता आपणही सोबत येऊ आणि सगळे रिपब्लिक गट एकत्र करूया, असं ते म्हणाले.
JEE Advanced Result 2021 । जेईई ॲडव्हान्सड परीक्षेत राजस्थानचा मृदूल अग्रवाल बनला टॉपर