मुंबई ब्युरो : देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.”
दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
नागपूरच्या अनेक भागात सकाळपासून पाऊस
नागपूरच्या वाडी, दत्तवाडी, हिंगणा, गोंडखैरी परिसरात सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. सकाळी जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला पाऊस हलक्या स्वरूपात पडतोय. मात्र ढगांमुळे काळोख पसरला आहे. हवामान विभागाने आधीच नागपूर सह पूर्व विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.