मुंबई ब्युरो : लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. पण वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिमच महावितरणने सुरू केली आहे. अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसने वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी एकच भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी झाली. आज प्रश्न उत्तराच्या तासात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीच्या मुद्दा उपस्थितीत केला. 57 खाली नोटीस देऊन फडणवीस यांनी घरगुती, शेतकरी वीज पंप कनेक्शन तोडल्या प्रकरणी प्रश्नं उपस्थित केला. ‘लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्दावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवले पाहिजे’, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही वीज बिलाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे मत व्यक्त केले. तसंच जे काही वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे, अशी मागणी केली.
त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. जोपर्यंत वीज बिलाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे’, अशी घोषणा केली.