Home हिंदी मृत्यूदर वाढणार नाही, याची काळजी घ्यावी -डॉ. नितीन राऊत

मृत्यूदर वाढणार नाही, याची काळजी घ्यावी -डॉ. नितीन राऊत

662

उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा

नागपूर ब्यूरो : जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची तुलना इतर प्रमुख शहरांशी पुढील काळात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मृत्यूदर वाढणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भातील संपूर्ण माहिती संकलीत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

कोरोना रोखण्यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अपर आयुक्त जलज शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधासाठी मार्च महिन्यापासून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली असून, या कालावधीत आरोग्य यंत्रणेने यासंदर्भात केलेल्या कामांची संपूर्ण माहिती तयार करावी. भविष्यातील उपाययोजनाच्या अंमलबजावणीसाठी या माहितीचा उपयोग होईल, असे निर्देश त्यांनी आज प्रशासनाला दिले.

ग्रामीण भागातील कोरोनाबाबत माहिती घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचर, स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून येत असलेली माहिती महत्त्वपूर्ण ठरणार असून, जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे कार्य यातून कळेल, असे ते म्हणाले. कोविड साथीच्या काळात पोलीस विभागाने शिस्त आणि संयमाने काम केले आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची भिती असल्याने त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी ठेवावी. तसेच कोविड काळात झालेले मृत्यू आणि दरवर्षी याच कालावधीत विविध आजाराने होणारे मृत्यू याबाबतचे तुलनात्मक विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना अद्याप संपलेला नसून, कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची तयारी सुरु आहे. तरीही प्रत्येक नागरिकाने तोंडावर मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यावर अनावश्यक फिरणा-या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश पालक मंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

कोविडशिवाय इतर आजारांमध्ये तसेच कोविडनंतर मानसिक रुग्णांमध्ये वाढ झाली असून, त्याचा वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. तसेच कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या विम्याच्या स्थितीबाबत माहिती घेण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. जिल्ह्यात कोरोनाशिवाय अन्य कारणांनी मृत्यू होत असल्यास आरोग्य विभागाने त्याची तशी वेगळी नोंद करावी आणि मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच मृत्यूदर कमी करताना उपाययोजनांची कमतरता भासल्यास त्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी महानगरपालिका व ग्रामीण भागातील खासगी आस्थापनांवर काम करणा-या कामगारांची संपूर्ण माहिती गोळा करण्यावर अधिक लक्ष देण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाला ही माहिती गोळा करताना अडचणी येत असल्यास त्याबाबत माहिती देण्यास सांगितले. राधाकृष्णन यांनी कोविडसंदर्भात मनपा क्षेत्रातील रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा, मृत्यू दर, पॉझिटीव्ह रुग्ण, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण, डबलींग रेट याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleProtest | किसान संगठनों का आज भारत बंद
Next articleहत्या मामले में नक्सलवादियों के प्लाटून कमांडर को आजन्म कारावास
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).