Home Maharashtra ख्यातनाम साहित्यिक नंदा खरे यांचे पुणे येथे निधन, पुरस्कार न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळे...

ख्यातनाम साहित्यिक नंदा खरे यांचे पुणे येथे निधन, पुरस्कार न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळे नाकारला होता साहित्य अकादमी पुरस्कार

नागपूर : आपल्या वेगळ्या धाटणीसाठी प्रसिद्ध असलेले ख्यातनाम साहित्यिक अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे यांचे पुणे येथे मुलाकडे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्यागौरी, मुलगा अमिताभ व एक मुलगी नर्मदा असा परिवार आहे. खरे यांचा जन्म २ ऑक्टोबर, १९४६ रोजी झाला.

खरे मराठी भाषेतील एक कादंबरीकार होते. आपल्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान देऊन केलेले त्यांचे लेखन वाचकप्रिय होते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. या शिवाय “दगडावर दगड, विटेवर वीट’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ठ होते.
‘उद्या’ ह्या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला. यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय सुमारे २०१७ साली त्यांनी घेतल्यामुळे २०२० साली ‘उद्या’ ह्या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला. ह्या नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यांनी स्पष्ट केले होते.

खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.

१९९३ ते २०१७ ह्या दरम्यान खऱ्यांनी ‘आजचा सुधारक’ ह्या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. यापैकी २००० ते २०११ या काळात ते ‘कार्यकारी संपादक’ होते. त्याचप्रमाणे १९८४ ते १९९१ ह्या कालखंडात ते मराठी विज्ञान परिषदेशी संलग्न होते. विवेकवादी विज्ञानाचा प्रसार व्हावा ह्या हेतूने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ते शैक्षणिक कार्यक्रम घेत असत.

मिळालेले पुरस्कार

‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ ह्या त्यांच्या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यांसाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला. ‘वीसशे पन्नास’ ह्या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो. रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार, ‘कहाणी मानवप्राण्याची’ ह्या मानवशास्त्रविषयक ग्रंथाला २०१० साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार मिळाला. तर एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला.

Previous articleमल्लिका शेरावत बोलीं- बॉलीवुड सो कॉल्ड मर्दों के जरिए चलाया जाता है, इसीलिए मुझे ज्यादा काम नहीं मिला
Next article#Maha_Metro | दूसरी मेट्रो रेल परियोजना महा मेट्रो के कार्यों का अनुकरण करे : श्याम दुबे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).