महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्यात आघाडीचे सरकार येईल, असा ठाम विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

गोव्यासह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गोव्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरी मुळे भाजपचा विश्वास दुणावला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीस यांच्या दाव्याला खोडले आहे.




















