नागपूर ब्युरो : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी 11 ऑक्टोबर ला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अश्विन प्रकाश मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांनी 11 तारखेच्या बंद दरम्यान व्यापारी लोकांना जबरदस्ती न करण्याची विनंती केली आहे.
त्यांनी रविवार, 10 ऑक्टोबर रोजी एक वीडियो संदेश जारी करुन ही मागणी केली आहे. ते म्हणाले की आम्ही सुद्धा लखीमपूर येथील घटनेचा विरोध करीत आहोत. आम्हाला सुद्धा वाटते की या प्रकरणात दोषी लोकांना शिक्षा दिली जावी, मात्र सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व्यापारी महाराष्ट्र बंद दरम्यान आपली दुकाने बंद करण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही. जर अश्या प्रसंगी व्यापारी बंद ला समर्थन करीत आपली दुकाने बंद करेल तर ग्राहक ऑनलाइन खरेदी कड़े वळण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे जे व्यापारी स्वतः दुकान बंद करतील त्यांचे स्वागत आहे. मात्र ज्यांना बंद करायचे नाही त्यांना जबरदस्ती केली जाऊ नये.