Home Maharashtra राऊतांचा सवाल । मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती...

राऊतांचा सवाल । मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?

542

मुंबई ब्युरो : मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार?, असा सवाल करतानाच युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपलं, असं राऊत म्हणाले.

शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही

पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

बऱ्याच लोकांना आमच्याकडे येण्याची ईच्छा

मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये ते बोलले. नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचं आहे, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून आणि नाव घेऊन त्यांनी विधान केलं. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत… विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितलं त्या त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोकं येऊ इच्छित आहेत. येतीलच आता. चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा म्हणून. काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. उडवू द्या. पतंगवर जाते आणि कापली जाते. येईल नंतर खाली, असा चिमटा राऊत यांनी काढला.

Previous articleMaharashtra | भाजपा के सेवा व समर्पण अभियान के तहत विभिन्न उपक्रम प्रारंभ
Next articleनागपूर काँग्रेसची मागणी । नागरिकांकडून कर स्वरुपात हजारो कोटी उकळणाऱ्या मनपा आयुक्तांवर कारवाई करा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).