25 दिवसांत 11 हजार किलोमिटरचा करणार प्रवास
18 तारखेला झिरो माईलपासून होणार सुरुवात
नागपूर ब्युरो : भंडा-याच्या तेजस्विनी ग्रुपच्या आठ स्वतंत्र आणि सक्षम महिला भारत परिक्रमा करणार असून 25 दिवसात 11 हजार किलोमिटरचा प्रवास करणार आहेत. परिक्रमेला शनिवार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता नागपुरातील झिरो माईलपासून प्रारंभ होणार आहे. भारत परिक्रमेला कंचनताई नितिन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तेजोनिधी ग्रुपच्या संयोजिका शुभांगी सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून ही भारत परिक्रमा आकाराला आली आहे. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील लोक, संस्कृती आणि वैभवशाली इतिहासाची माहिती करून घेण्याचा या परिक्रमेमागचा उद्देश आहे, असे शुभांगी सुनील मेंढे म्हणाल्या.
‘अतुल्य भारत’ आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या सौजन्याने निघणारी ही भारत यात्रा देशातील 13 राज्यातून सुमारे 11 हजार किलोमीटरचा प्रवास करेल. यात 9 ज्योतिर्लिंग,7 नद्या आणि काही ऐतिहासिक स्थळांचा समावेश राहणार आहे.
शुभांगी मेंढे यांच्यासह डॉ. प्रीती दुर्गेश चोले, डॉ. जया गोपाल व्यास, डॉ. प्रीती जगदीश लेंडे व डॉ. वनिता डी. शाह भंडारा येथून परिक्रमेत सहभागी होणार असून नागपुरातून मंजुषा जोशी तर दिल्ली येथून अॅड. मिनल भोसले व सारिका मोहोत्रा यांचा या परिक्रमेत सहभाग राहणार आहे. या आठही महिला स्वत: कार चालवून ही 11 हजार किलोमीटरची परिक्रम पूर्ण करणार आहेत. या परिक्रमेकरिता एमजी मोटर्स इंडिया यांचे सहकार्य लाभत आहे.