नागपूर ब्युरो : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरांत आणि जिल्हांत शिथीलता दिली आहे. त्यानुसार नागपुरात निर्बंध शिथील झाले आहेत. त्यानुसार हॉटेल उघडी ठेवायला दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पण सरकारच्या निर्णयाने नागपुरातील हॉटेल व्यावसायिक कमालीचे नाराज झाले आहेत. आता शिथीलता नको तर मोकळेपणा द्या, आम्ही रात्रीपर्यंत हॉटेल सुरु ठेवणार, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
आम्ही रात्रीपर्यंत हॉटेल सुरु ठेवणार!
राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिक नाराज झाले आहेत. ‘सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप नागपुरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. तसंच आम्ही सरकारच्या निर्णयावर खूश नाही असं सांगत हॉटेल रात्रीपर्यंत सुरु ठेवणार असल्याचा हॉटेल चालकांनी सरकारला इशारा सुद्धा दिला आहे.
कालच फडणवीसांच्या भेटीला गेले होते व्यापारी
नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर घातली. आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचं न ऐकता दुकानं उघडू, प्रसंगी असहकार आंदोलन छेडू, असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी फडणवीसांना भेटल्यावर व्यक्त केला होता. दरम्यान सोमवारी उशिरा राज्य सरकार ने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांत शिथीलता दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र
सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायिक यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी 4 नंतर सुरू होतो. पण, 4 वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे अनलॉक करा, अशी मागणी फडणवीसांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून मुख्ममंत्र्यांकडे गेल्या आठवड्यात केली होती.