मुंबई ब्युरो : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर येथे स्थानिक पातळीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील इतर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईत 3 हजारांपेक्षा रोज रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. राज्यात मंगळवारी 28 हजार 699 रुग्ण नव्याने आढळले असून तब्बल एकशे बत्तीस रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे राज्यातील रिकवरी रेट 88.73 टक्के एवढी झाली असून दिवसेंदिवस पूर्ण संख्या वाढताना दिसत आहे, अशा सगळ्या परिस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी मुंबईत होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कदाचित महाराष्ट्रमध्ये पुढील काळामध्ये वाढती संख्या पाहता लॉकडाउन पुन्हा एकदा जाहीर करण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः शहरी भागात आणि ग्रामीण भागात जिथे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कंटेनमेंट होऊन असलेल्या भागात कदाचित कठोर निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसंच या भागात पुन्हा कोविड जम्बो सेंटर सुरू करण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट, कनेक्ट आणि ट्रेसिंग यावर भर राज्य सरकार देत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्या भागांमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल अशा भागात कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत दिली टोपे यांनी दिले आहेत.