Home मराठी स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार : नाना पटोले

स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार : नाना पटोले

605

कल्याण ब्युरो : येत्या महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबाबत दुजोराही दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल या पद्धतीची व्यूहरचना आम्ही केलेली आहे. याच पद्धतीने आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

मात्र एकीकडे काँग्रेसचे काही नेते येत्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देत असले तरी याबाबत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. निवडणुका स्वबळावर लढणार असल्याबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, आज याबाबत बोलणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतल्यानंतरच अलायन्स केल्या जातील. जी काय परिस्थिती आहे त्या आधारावर निर्णय घेतले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. नाना पाटोले आज कल्याण पूर्वेतील काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटन करण्यासाठी कल्याणमध्ये आले होते.