कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनेक निर्बंधासह नवी नियमावली जारी केली आहे. हे सर्व निर्बंध उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) लागू असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
यामध्ये राज्यातील स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आहे. चित्रपटगृह रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच, नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.
काय आहेत निर्बंध?
- रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी
- सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू
- राज्यातल्या शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
- मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद
- जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा पूर्णपणे बंद
- सलून खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
- उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू
- कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ
- लग्न कार्यासाठी 50 तर अत्यंविधीसाठी 20 जणांना परवानगी
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत 41,434 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 13 रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. सध्या 1 लाख 73 हजार 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान 9,671 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. संसर्गाच्या भयावह वेगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नवीन नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्री 12 पासून लागू होतील. मात्र, सध्या तरी सरकारने मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.
गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 20,318 रुग्ण आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील बाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या एका दिवसात 5 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन अहवालानंतर, आता आर्थिक शहरामध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 06 हजार 037 वर पोहोचली आहे.