ठाकरे मंत्रिमंडळातील १३ मंत्री आणि राज्यातील ७० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने बुधवारी होणारी नियोजित साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठक रद्द झाली असली तरी राज्यासाठीचे नवे निर्बंध आज सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यासंदर्भात सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जी चर्चा होईल त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंकाळी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील पहिली ते आठवी शाळा ३० जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची किंवा कसे, याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होत असते. कोरोना संसर्गापासून ही बैठक मंत्रालयाऐवजी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात होत होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे या हजेरी लावतात. त्यानुसार बुधवारी ( ५ जानेवारी) बैठकीचे नियोजन होते. मात्र मंत्रिमंडळातील १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचे निरोप मंगळवारी दुपारी मंत्र्यांच्या खासगी सचिवांना देण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदिवशी बहुतांश आमदार आपली कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात. कार्यकर्त्यांची व कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते.

७० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय झाला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदी मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. निवडणुकांबाबतचा निर्णय आयोगावर अवलंबून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात छेडले असता निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयाेग घेत असते. काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नैसर्गिक संकट आल्याने निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आयाेगाने गांभीर्याने काय तो निर्णय घ्यावा, असे अजित पवार म्हणाले.
महाविद्यालयांबाबत आज निर्णय
राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. मात्र शाळांप्रमाणेच महाविद्यालयांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावरच द्यावे, असा सूर राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकारी, कुलगुरू व शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केले.
राज्यात १८,४६६ नवे कोरोना रुग्ण; ७५ ओमायक्रॉनबाधित
राज्यात मंगळवारी १८,४६६ नवीन रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यापैकी ७५ रुग्ण ओमायक्रॉनने बाधित असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६६,३०८ झाली असून यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे ४७,४७६ रुग्ण आहेत.
लोकसंख्येच्या घनतेनुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर, वसई विरार, पुणे आणि नाशिक या महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसते. दरम्यान, मुंबईत मंगळवारी कोरोनाचे १० हजार ६८० आणि ओमायक्राॅनचे ४० नवे रुग्ण आढळले. शहराची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनेच सुरु आहे. दैनंदिन रुग्णसंख्या २० हजाराच्या पुढे गेल्यास लाॅकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ६५३ झाली असून त्यात सर्वाधिक म्हणजे ४०८ रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत.




















