करारानुसार वीजपुरवठा करा, अन्यथा करारच रद्द करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदानी पॉवर आणि जिंदल पॉवर या खासगी वीज कंपन्यांना फटकारले. दरम्यान, अदानी पॉवर १७०० वरून ३१०० मेगावॅट वीज शनिवारपासूनच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भारनियमनाच्या संकटातून महाराष्ट्राची सुटका होऊ शकेल.
अदानी पॉवर कंपनी करारानुसार वीजपुरवठा करत नसल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी अदानी पॉवर आणि जिंदाल पॉवर कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली. अदानी आणि जिंदल पॉवर या खासगी वीज कंपन्यांनी महाराष्ट्राला कराराप्रमाणे वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार, अदानी पॉवरने शुक्रवारी ५५० मेगावॅट वीज उपलब्ध करून दिली तर शनिवारपासून करारानुसार ३१०० मेगावॅट वीज उपलब्ध होईल.




















