महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) संजय पांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर राज्यातील दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) एसपीच्या दोन रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यांनी इच्छुक उमेदवारांना विभागाशी संपर्क साधावा किंवा सोशल मीडियाद्वारे त्यांचे अर्ज पाठवण्यास सांगितले आहे. खरे तर, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून एटीएससाठी आणखी टीम सदस्यांची मागणी केली होती. मात्र, संजय पांडे यांच्या या पोस्टवर अग्रवाल यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
गेल्या आठवड्यात त्यांच्या फेसबुक पेजवर डीजीपी संजय पांडे यांनी लिहिले होते की, एटीएस, मुंबईमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) ची दोन पदे रिक्त आहेत. एटीएस पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे. ज्यात 25% विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी थेट एडीजी एटीएस किंवा एडीजी सोबत संपर्क साधू शकतात.
मात्र, आतापर्यंत फारशा लोकांनी एटीएसकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. अनेक वर्तमान आणि माजी एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याच्या दहशतवादविरोधी युनिटने गेल्या काही वर्षांत आपली चमक गमावली आहे. कारण केंद्राच्या राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे (एनआयए) अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांची चौकशी केली जात आहे. आता एटीएसकडे अधिका-यांचा कल कमी होत असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. इतकेच नव्हे तर केंद्र आणि राज्य यांच्यातील सततच्या भांडणामुळे केंद्र आणि राज्याच्या एजन्सींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम झाल्याचे माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे राज्याच्या यंत्रणांबाबत लोकांचा भ्रमनिरास होत आहे.




















