नागपूर ब्यूरो: प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे. हे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ज्येष्ठ कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली आहे. या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल आणि तालिबान सारख्या संघटनांच्या ध्येयांमध्ये कोणताही फरक नाही. या संघटनांच्या ध्येयाच्या मार्गात भारतीय संविधान एक अडथळा बनत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमाही ओलांडतील. जगातील सर्व उजवे (राइट विंग) समान असल्याचे सांगत अख्तर म्हणाले की, ‘ख्रिश्चन उजवे असो, मुस्लिम उजवे असो किंवा हिंदू उजवे असोत, सर्वांमध्ये समानता आहे. तालिबानला इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे. यांना हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. ते म्हणतात, ज्यांची परंपरा वेगळी आहे, ते त्यांना स्वीकारणार नाहीत. या लोकांना मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नयेत असे वाटते. दोघांमधील फरक हा आहे की ते अद्याप तालिबानइतके शक्तिशाली नाहीत, पण तालिबानी लोकांचे जे ध्येय आहे तेच याही लोकांचे आहे.’