केंद्रीय अध्यक्ष श्री दादासाहेब इदाते यांचे आवाहन
भटक्या विमुक्तांची विचार मंथन बैठक संपन्न
नागपूर ब्युरो : भटक्या विमुक्तांचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व आर्थिक विकास झाला नाही. हे जरी खरे असले तरी भटक्या विमुक्तांसाठी प्रथमच आर्थिक सक्षमीकरणासाठी तयार केलेल्या सिड योजनेंचा लाभ घेऊन विकासाचे दरवाजे खुले करावे, असे आवाहन भटके विमुक्त कल्याण विकास बोर्डचे केंद्रीय अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य मा दादासाहेब इदाते यांनी केले.
आज (ता 27) रविभवनात भटके विमुक्त आर्थिक सक्षमीकरण (SEED) अंतर्गत योजना प्रगटीकरण व विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भटके-विमुक्त कल्याण विकास बोर्डचे केंद्रीय अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य मा दादासाहेब इदाते उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संघर्ष वाहिनीचे संघटक श्री दिनानाथ वाघमारे, बंजारा समाजाचे नायक आत्माराम राठोड, गाडीलोहार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिवलेकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ विकास महात्मे यांनी सिड योजनेंतर्गत मंजूर असलेल्या योजनांचा लाभ भटक्या विमुक्त समाज बांधवांनी घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दादासाहेब इदाते यांनी सांगितले की, केंद्र सरकारने इदाते आयोगाचा अहवाल स्विकारल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य होते. यासाठी भटके विमुक्त कल्याण विकास बोर्डच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रथमच भटक्या विमुक्तांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सिड योजना तयार झाली आहे. या योजनेंतर्गत
स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या डीएनटी विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेसचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार, आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विमा व औषधोपचारांसाठी प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये उपलब्ध करणार, छोट्या छोट्या गटांना कौशल्य विकासासाठी योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देणार, डीएनटी समुदायांमधील लोकांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत डीएनटी चा वेगळा विभाग करून भारत सरकार आर्थिक मदत करणार या योजनांचा समावेश आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता याची पायाभरणी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सामजिक लोकशाहीचा एक नवा अध्याय सुरू झाला असून या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी भटके-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन दादासाहेब इदाते यांनी अध्यक्षपदावरून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद अडेवार यांनी करुन कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये यांनी तर आभार प्रदर्शन सौ योगीता मांचमवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष श्री किशोर सायगन, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, खिमेश बढिये, अर्चना कोट्टेवार, जयश्री राठोड, दुलसिंग राठोड, सौ प्राची गांगुलवार, सौ शितल बगळे, पुष्पा बढिये, योगिता मांचमवार, राजू चव्हाण, विनोद आकुलवार, हिरामन साखरे, प्रभाकर मांढरे, रामा जोगराणा, धर्मेंद्र जाधव, प्रेमचंद राठोड, मनोज चव्हाण, प्रदिप बिबटे, अश्विनी नागुलवार, योगेश बन, मनोज राठोड यांच्यासह भटके-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.




















