सीबीएसई आणि अन्य शिक्षण मंडळांच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षा कशी काय घेतली जाऊ शकते, अशी तोंडी विचारणा न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली होती. त्यानंतर आज दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ऑनलाईन परिक्षा घेण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फोटाळली आहे. त्यामुळे सर्व बोर्डाच्या परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील काही दिवसांपूर्वीच परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली होती. हिंदुस्थानी भाऊने याचे नेतृत्व करत राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. कोरोनामुळे अभ्यास पूर्ण न झाल्याने तसेच शिक्षण ऑनलाईन सुरू असून, परिक्षा देखील ऑनलाईन घ्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आज परिक्षा ऑफलाईनच होणार असल्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ओडिसा स्टुडंट युनियनने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत म्हणण्यात आले होते की, कोरोनामुळे वर्षभर शाळा तशाच बंदच आहेत. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. मात्र, अनेकांना ते ही शिक्षण मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन, अभ्यास सारेच मागे पडले. हे पाहता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेऊ नयेत. त्यात एक तरी ऑनलाईन घ्यावात किंवा परीक्षा न घेताच पर्यायी पद्धतीने त्यांचे मूल्यमापन करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
जाहीर झालेले परीक्षेचे वेळापत्रक : इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.